अंडर करंटचा झटका –

अंडर करंटचा झटका –

लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आला आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय पंडित देखील जागांचे भाकीत व्यक्त करायला घाबरत आहेत. यावेळी ना लाट आहे, ना वारे आहे. यावेळची निवडणूक लोकांच्या हातात आहे. म्हणून तर अंडर करंट आहे असे म्हणतात. ग्राउंडवर जाऊन लोकांशी निवडणुकी विषयी बोलताना डोळे विस्फारून जातात. दहा वर्षापूर्वीचे दिवस वेगळे होते. लोक बातम्यांना, सोशल मीडियाला भुलत होते. खऱ्या खोट्याची शहानिशा न करता मत बनवत होते. यावेळी परिस्थिती बदलली आहे. बातमी मागची बातमी लोक शोधतात. मागच्या पाच वर्षात मेन स्ट्रीम मीडिया सोडून यू ट्यूबवर एक वेगळे मीडियाचे जग तयार झाले. आणि त्याच मीडियाला लोक फॉलो करत आहेत. रविश कुमार, अभिसार शर्मा, साक्षी जोशी, पुण्यप्रसून वाजपेयी या लोकांनी यू ट्यूब वरून वास्तव दाखवायला सुरुवात केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रादेशिक भाषेत देखील असे पत्रकार तयार झाले. मराठीत देखील निखिल वागळे, प्रशांत कदम, रवींद्र पोखरकर, मुक्ता कदम या सुजान पत्रकारांनी बातमी मागची बातमी दाखवल्यामुळे लोकांना सत्य एका क्लिकवर कळायला लागले. म्हणून तर प्रज्वल रेवन्ना आणि एच डी रेवन्ना यांचे सेक्स कँडल लोकांना माहीत झाले. एव्हाना अशी प्रकरणे बरोबर दाबली गेली असती. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात ठाण मांडून बसावे लागत आहे. यापूर्वी अशी वेळ कोणत्याच पंतप्रधानावर आलेली नाही. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तीन पक्षात मोठमोठे नेते आहेत. राज ठाकरे सारखा गर्दी खेचणारा वक्ता आहे तरीही मोदी आणि शहा यांनाच किल्ला लढवावा लागतोय. भाषणातील मुद्दे देखील तेच तेच आहेत. फडणवीस मधूनच कोरोना लसीचा मुद्दा काढतात. हा मुद्दा खरं म्हणजे निवडणुकीत लागूच होत नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न वेगळे आहेत. ग्रामीण भागातील लोकांना राम मंदिराचा नक्की अभिमान आहे. परंतु राज्यातील लोक त्याचे श्रेय भाजपला देत नाहीत हे भाजपचे मोठे दुःख आहे.
महाराष्ट्रात भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन पक्ष फोडून सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना फोडून भाजपने सरकार स्थापन केले. इथपर्यंत लोकांना काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु शिवसेना पक्ष,नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर जनता खऱ्या अर्थाने भडकली. तीच गोष्ट अजित पवार यांच्या बाबतीत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाही सभेत भ्रष्टाचारावर बोलू शकत नाहीत कारण, ज्यांच्यावर त्यांनी मागच्या काळात टीका केली होती ते सगळे नेते आज त्यांच्या प्रचासभेत त्यांच्या शेजारी बसलेले दिसतात. आतापर्यंत दोन टप्प्यात विदर्भातील ज्या जागांवर मतदान झाले आहे त्या जागांवर भाजपला सहजासहजी विजय मिळणार नाही असं ग्राउंड रिपोर्ट वरून समोर येत आहे. कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, संभाजीनगर आणि मुंबईतील सहापैकी चार जागांवर महाविकास आघाडीचे पारडे जड आहे. बीडमध्ये जरांगे फॅक्टर चालला तर पंकजा मुंडे यांना निवडणूक जड जाणार आहे. महाराष्ट्रातील काही जागा सोडल्यास भाजपला ही निवडणूक बिलकुल सोपी नाही.
या निवडणुकीत ज्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे असे एकच नेते आहेत ते म्हणजे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे यांना सध्या जो प्रतिसाद मिळत आहे तो यापूर्वी कोणालाच मिळालेला नाही. त्यांची भाषणं, त्यातील मुद्दे, मोदी-शहा यांना थेट अंगावर घेण्याची त्यांची पद्धत लोकांना अपील होत आहे. त्यांच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही त्यामुळे ही निवडणूक उद्धव यांच्यासाठी फ्री हिटच्या चेंडूसारखी आहे. जय भवानी च्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाने उद्धव यांना नोटीस देऊन नो बॉल टाकला. त्याचा पुरेपुर फायदा उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत घेत आहेत.
या निवडणुकीतील लोकांचे जनमत सांगणे कठीण आहे. पारावर बसलेला ग्रामीण मतदार कांदा निर्यात बंदी, शेतीपिकाचे हमीभाव, कृषी यंत्रावरील जीएसटी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खनिज तेलाचे भाव या विषयावर तासनतास बोलताना दिसतात. नमो सन्मान मधून मिळणाऱ्या सहा हजारांचं कौतुक कोणालाही नाही. सहा हजार रुपयांपेक्षा शेतकरी दिवसाला फक्त 16 रुपये 66 पैसे मिळतात असं सांगतात. सोशल मीडियाचे पीक डेली दोन जीबी डेटातून घराघरात फोफावले आहे. त्यातूनच अंडर करंट निर्माण झाला आहे. दहा वर्षांपूर्वी जो सोशल मीडिया भाजपला सत्ता सोपान चढण्यासाठी मदत करत होता, तोच सोशल मीडिया आज त्यांचीच पोलखोल करत आहे. ही निवडणूक सोपी नाही. निकाल धक्कादायक असतील. आजच लिहून ठेवा 4 जून फक्त 45 दिवस लांब आहे. भल्या भल्यानं अंडर करंट बसणार आहे.

– सज्जन यादव

Leave a Comment